तीन दिवसांच्या मुसळधार बॅटींगनंतर मुंबई पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?

तीन दिवसांच्या मुसळधार बॅटींगनंतर मुंबई पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?

Mumbai Rain : आज मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. (Mumbai) मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी रिमझिम पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागलं.

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. काही ठिकाणी लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. पण आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून, शहरात फक्त रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुंबईत संततधार पावसानंतर आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन सुरू, लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट, कोणत्या स्थानकावरील लोकल सुरू?

यामुळे मुंबईकरांनी पुढील काही तास आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या अर्धा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कामावर निघालेले नोकरदार आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तीन दिवसांच्या सतत पावसानंतरही, वीरा देसाई रोडवर अजूनही पाणी साचलेले आहे. पण पाऊस थांबल्यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

मुंबई महापालिकेचे आवाहन काय?

बृहन्मुंबई क्षेत्रात मागील दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच, बुधवार, दिनांक २० ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून अधून मधून संततधार पाऊस सुरु आहे. सद्य परिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेसेवेसह ‘बेस्ट’ वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on field) अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube